राज्यातील सैनिकी शाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मोठा दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. सध्या दिला जाणारा निर्वाह भत्ता 15 हजार रुपयांवरून थेट 50 हजार रुपयांपर्यंत वाढविण्याचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन असल्याची माहिती संजय शिरसाट यांनी विधानपरिषदेत दिली. या निर्णयामुळे सैनिकी शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना आर्थिक मदत मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता आहे.
ही बाब लक्षवेधी सूचनेद्वारे मांडताना शिवाजीराव गर्जे यांनी प्रश्न उपस्थित केला होता, तर चर्चेत सदाभाऊ खोत यांनीही सहभाग घेतला. यावर उत्तर देताना मंत्री शिरसाट यांनी सांगितले की, शालेय शिक्षण विभागाकडून यासंदर्भातील प्रस्ताव सादर करण्यात आला असून त्यावर सकारात्मक भूमिका घेतली जात आहे.
मंत्री शिरसाट यांच्या मते, या योजनेच्या अंमलबजावणीसाठी समितीचा अहवाल अद्याप प्रलंबित आहे. अहवाल प्राप्त झाल्यानंतर अंतिम निर्णय घेतला जाईल. २०२५-२६ या आर्थिक वर्षासाठी या योजनेसाठी सुमारे ७.१५ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असून पात्र विद्यार्थ्यांना त्याचा लाभ देण्यात येत आहे.
दरम्यान, राज्यातील काही सैनिकी शाळांकडून प्रस्ताव अजूनही प्रलंबित असून काही ठिकाणी भत्त्याचे वितरण पूर्ण झाले आहे. भत्ता वाढीबाबत अंतिम निर्णय घेण्यासाठी संबंधित संस्थांसोबत लवकरच बैठक घेऊन पुढील कार्यवाही करण्यात येणार असल्याचेही मंत्री शिरसाट यांनी स्पष्ट केले.

